टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महाडीक बंगल्यासमोर कंटेनरची मोटरसायकला धडक दिल्याने तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. विद्याधर गणपती पेंढारे (रा. उचगाव शेवरे ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, सध्या शुक्रवार पेठ, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. हा तरूण हा कामानिमित्त पुणे येथून कोल्हापूरला येत असताना हा अपघात झाला.

पेंढारे हा पुण्याहून कोल्हापूरला आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच ०९ बी क्यु ७०६२ वरून येत होता. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनर क्रमांक एम एच ०६ ए क्यू ६९४२ ने धडक दिल्याने पेंढारे मोटरसायकल सोबत ५० मीटर लांब फरफटत गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पेंढारे हा मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील उचगांव शेवरे गावचा असून तो गेली वर्षभरापासून पुणे येथे कामाला होता. लॉकडाऊन चालू झाल्यापासून कंपनीने घरी राहून काम करण्याचा आदेश दिल्याने पेंढारे हा घरातून आपले ऑफिसची कामे करत होता.

तो कंपनीने दिलेल्या लॅपटॉपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे येथे आपल्या मोटरसायकलवरून गेला होता. काम आटपून कोल्हापूरला येत असताना त्यांच्यावर  काळाने घाला घातला. या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.