कळे (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील गवशी येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून एका तरुणाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना आज (रविवार) घडली आहे. डोक्यात काठीचा वर्मी घाव बसल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत पोलिसात उशीरापर्यत गुन्हा नोंद झाला नव्हता.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली होती. त्या मिरवणुकीचे चित्रीकरण पाहण्यावरून दोन दिवसांपूर्वी दोन तरुणांमध्ये किरकोळ हाणामारी झाली होती. त्यावेळी या वादावर गावातील ज्येष्ठांनी तोडगा काढत पडदा टाकला होता. मात्र, आज हा तरुण तरुण  बाहेर गावी जायच्या तयारीत असताना विसरलेले पैशाचे पाकीट घेण्यासाठी मोटरसायकल वरून घरी येत होता. त्याचवेळी पाळत ठेवून असणाऱ्या दुसऱ्या तरुणाने काठीने सदर तरुणावर जोरदार हल्ला केली. त्यामुळे  डोक्यात वर्मी घाव बसल्याने संबंधित तरुण जागेवरच बेशुद्ध पडला.

दरम्यान, या बेशुद्ध तरुणाला नातेवाईकांनी तत्काळ कोल्हापूर येथील सीपीआर येथे  दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर स्वरूपाची मारहाण झाली असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची सध्या  प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसानी गावामध्ये पाहणी केली आहे.