नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे पाहिलेत. त्यांची जुनी भाषणे ऐकली. कृषी मंत्रालय सांभाळत होते, त्यांची पत्र वाचली. तर आज कृषी क्षेत्रात जे बदल केले आहेत. ते वेगळे नाहीत. आमचे सरकार शेतकरी समर्पित असून आम्ही फाईलींच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या. हमीभावात दीड टक्क्यांनी वाढ केली, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मध्य प्रदेशमध्ये आयोजित केलेल्या किसान महासंमेलनात मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या कायद्यांवर चर्चा सुरू आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार केलेले नाहीत. मागील २०-२२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारने यावर समग्रपणे चर्चा केली आहे. सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचे सर्व श्रेय तुम्ही घ्या. सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे, असे मोदी म्हणाले.