मुंबई (प्रतिनिधी) : मला वाटतं शरद पवार यांना योग्य माहिती दिली गेलेली नाही. त्यांच्या तोंडून चुकीची माहिती बोलवून घेतली गेली. हे आता उघड झालं आहे,  असा आरोप  वेगवेगळी कागदपत्रे सादर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत केला.

फडणवीस म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांच्यासह काहीजणांना अटक केली आहे. यातच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. पण, शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत  सिंग यांचं दावे तथ्यहिन असल्याचे सांगितले. कारण देशमुख त्यावेळी क्वारंटाइन होते, असे फडणवीस म्हणाले.

गृहमंत्री १५ तारखेला एका खासगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन नोंदीचा एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील, अशी नोंद आहे. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचे पोलिसांची नोंद आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही. यात महत्त्वाची बाब म्हणजे सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होतं,  असे फडणवीस म्हणाले.