कोल्हापूर (प्रतिनिधी) : जल जीवन मिशन अंतर्गत जलशक्ती मंत्रालय, केंद्रशासनाव्दारे  ३१ डिसेंबर अखेर ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान राबविले जात आहे. या अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा आज जिल्हा परिषदेच्या राजर्षि शाहू सभागृहात झाली.

जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते स्वच्छ जल से सुरक्षा अभियान फलकाचे अनावरण करून या कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत प्रतिदिन, प्रतिव्यक्ती ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करताना ते पाणी शुध्दीकरण केलेले असावे याबाबत खात्री करावी. जिल्हयामध्ये दूषित पाण्यामुळे साथरोग पसरणार नाहीत, यासाठी शुध्द व गुणवत्तापूर्ण पाणी देण्यासाठी ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान यशस्वीपणे राबवा असे आवाहन संजयसिंह चव्हाण यांनी केले.

पाणीपुरवठा करताना हे सांडपाण्यामध्ये परावर्तित होऊ नये यासाठी गावागावांमध्ये वॉटर मीटर बसविण्याची कार्यवाही करावी, पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या धर्तीवर सर्वच गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनासाठी कुटुंबस्तरावर तसेच सार्वजनिकस्तरावर उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या.

या अभियानदरम्यान अस्तित्वातील सर्व नळ पाणीपुरवठा योजना व रेट्रोफिटींग करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रमुख स्त्रोतांचे हर घर जल या ॲपव्दारे जीओ टॅगिंग पूर्ण करणे, पाणी गुणवत्तेसाठी गावस्तरावर नियुक्त केलेल्या महिलांव्दारे क्षेत्रीय पाणी तपासणी संचाव्दारे पाण्याची गुणवत्ता तपासणे, असे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याबाबत प्रियदर्शिनी मोरे (प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन) यांनी कार्यशाळेच्या प्रास्ताविकात सांगितले. सचिन सुपेकर यांनी स्वच्छ जल से सुरक्षा अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी ग्रामपंचायत विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, तालुकास्तरावरून सर्व गटविकास अधिकारी, उपअभियंता व शाखा/ कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील सर्व तज्ञ, सल्लागार उपस्थित होते. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी आभार मानले.