इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील जांभळी येथील टाकवडे मार्गावरील वीज कनेक्शन थकबाकी तटल्यामुळे पथदिवे बंद केले आहेत. त्यामुळे भागातील महिलांनी महावितरण कार्यालयावर आज (शुक्रवार) मोर्चा काढला. यावेळी कार्यालय बंद असल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी सरपंचांना घेराव घातला. थकबाकी असताना संपूर्ण गावात पथदिवे सुरू आहेत. मात्र टाकवडे रोडवरचे पथदिवे बंद का ? असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी केला. अखेर महिलांचा रोश पाहता महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करत पथदिव्यांचे कनेक्शन पूर्ववत जोडले.
अनेक वर्षांपासून जांभळी-टाकवडे पथदिवे नसल्यामुळे हा मार्ग अंधारातच होता. गेल्यावर्षी टाकवडे मार्गावर विद्युत पोल उभारून ग्रामपंचायतीने पथदिवे जोडले. मात्र, काही दिवसांनी थकबाकीच्या कारणामुळे विद्युत कनेक्शन तोडून पथदिवे बंद केले. त्यामुळे टाकवडे मार्गावर ऐन पावसाळ्यात नागरिकांना अंधाराला सामोरे जावे लागले. यावेळी संतप्त महिलांनी आज महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. महावितरण कार्यालय बंद असल्याने महिलांनी सरपंच खंडू खिलारे यांना घेराव घालून धारेवर धरले. आणि तात्काळ पथदिवे सुरू करण्याची मागणी केली. यावेळी सरपंच खिलारे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पथदिवे सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार महावितरणने त्वरित वीजपुरवठा सुरळीत केला. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात शुभांगी कदम, जयश्री गायकवाड, शीतल कांबळे, दिव्या कदम, सुवर्णा राऊत, संगीता कदम, कविता कोळी, वनिता कांबळे, मीनाक्षी कांबळे आदी सहभागी झाल्या होत्या.