मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजप-शिवसेना यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपसोबत सत्तेत असताना नामांतरचा प्रस्ताव का पाठवला नाहीत?  असा सवाल करत तेव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का ? असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे.

कदम म्हणाले की, भाजपसोबत पाच वर्षे शिवसेना सत्तेत असताना औरंगाबादच्या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळेस शिवसेनेने औरंगाबादचे नाव बदलण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे का पाठवला नाही? महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यावर आता शिवसेनेला पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला आहे.  काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.