मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे. पुढची अडीच वर्ष आमचे सरकार पूर्ण करणार असल्याचा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. दिलेली वेळ निघून गेली आहे. लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला आव्हान दिले आहे.

माझी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा झाली. आम्ही पूर्ण तयारी केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल. आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार असल्याचा निर्धार राऊत यांनी केला आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना चॅलेंज केले आहे. ज्यांना आमचा सामना करायचा आहे, त्यांनी मुंबईत यावे आणि सामना करावा, असा इशारा देखील राऊतांनी दिला.

या लोकांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही संधी दिली होती; मात्र वेळ निघून गेला आहे. त्यामुळे आम्ही आता लढायला तयार असल्याचे राऊत म्हणाले. आम्हाला जे करायचे ते आम्ही आता केले आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरु असल्याचेही राऊतांनी सांगितले.