कागल (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कागलमध्ये ना. मुश्रीफ यांची सकल मराठा समाजाच्या  कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला घटनात्मकरित्या टिकणारे आरक्षण द्यावे, त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे  मागणी करावी, सारथीवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या संस्थेची जिल्हानिहाय विस्तारवाढ व दरवर्षी दोन हजार कोटी रुपये निधी द्यावा, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची कर्जमर्यादा वैयक्तिक २५ लाख व सामूहिक ५० लाख करा. दरवर्षी पाच हजार कोटींची तरतूद व व्याज परतावा नियमित मिळावा, मराठा आरक्षणातून नियुक्त झालेल्या २,७६० उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, नोकरी व शिक्षणामध्ये मराठ्यांना ओबीसी प्रमाणेच सुविधा द्याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी  नितीन दिंडे, विशाल पाटील, प्रकाश जाधव, नितीन काळबर, आनंदा पसारे, नानासो बरकाळे, विक्रम चव्हाण, सचिन मोकाशी, महेश मगर, दिपक मगर, शशिकांत भालबर, अमित पाटील, संग्राम लाड, अविनाश जाधव, सचिन निंबाळकर, दिग्विजय डुबल, प्रशांत म्हातुगडे, जितेंद्र सावंत आदी उपस्थित होते.