गडहिंग्लज (प्रतिनिधी) : सहकार खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवानी दिलेल्या निर्णयाप्रमाणे संचालक मंडळाने गोडसाखर कारखान्याचा ताबा घेतलेला आहे.  त्यांना त्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जे लागेल ते सहकार्य करण्याची माझी तयारी आहे, ते माझे कर्तव्यच आहे, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुश्रीफ म्हणाले की, गोडसाखर हा ४६ वर्षापूर्वी उभारलेला जिल्ह्यातील जुना साखर कारखाना २०११ मध्ये आर्थिक अडचणीमध्ये आला. त्यामुळे ऊस उत्पादक, कामगार, तोडणी- वाहतूकदार या सर्व घटकांच्या कल्याणासाठी माझ्या मित्रमंडळींच्या ब्रिस्क फॅसिलीटीज या कंपनीस मी सदर कारखाना शासनाच्या सहभाग योजनेखाली चालवण्यास तयार केले. सन २०१३- १४ ते २०२०-२१ या आठ वर्षात त्यांनी कारखाना यशस्वीपणे चालवला. परंतु परंतु या आठ वर्षांमध्ये काही कटू प्रसंग आले, विशेषत: कामगारांच्या प्रश्नामुळे. त्याचा फार मोठा परिणाम ब्रिस्क कंपनीच्या व्यवसायावर झाला की, त्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. कार्पोरेट कंपन्या, मल्टिनॅशनल कंपन्या या कामगारांच्या प्रश्नावर संवेदनशील असतात. या कंपन्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले. उर्वरित राहिलेली दोन वर्षे पूर्ण करावीत, असा माझा आग्रह होता. परंतु, शासनाने ठरवलेली शंभर टक्के रक्कम प्रथमच अदा केल्याने काही गोष्टीत कंपनीचा नाइलाज झाल्यामुळे अधिकची रक्कम व सुविधा करणे कंपनीला भाग पडले. त्यामुळेच आर्थिक भुर्दंड झाला. 

दरम्यान, कंपनीची उर्वरित एफआरपी, तोडणी – वाहतूकदारांची देयके, कामगारांची कायदेशीर देणी इत्यादी गोष्टींत ज्याप्रमाणे आठ वर्षे प्रामाणिकपणे व्यवहार केला, त्याप्रमाणेच कंपनी या बाबतीतही प्रामाणिकपणानेच व्यवहार करेल, यावर माझा विश्वास आहे. तसेच सहकार विभागाच्या निर्णयाप्रमाणे कंपनीची योग्य देणी कारखाना संचालक मंडळ कंपनीस अदा करेल, यावरही माझा विश्वास असल्याचे मुश्रीफ म्हणाले.