बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर ठाकरे सरकारसह शिवसेनेची कोंडी झाली होती. यावरून विरोधी पक्ष भाजपने चांगलेच रान पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, याप्रकऱणावर पूजा चव्हाणच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कोणाचीही तक्रार करायची नाही, आम्हाला जगू द्या, अशी विनंती पूजाच्या  वडिलांनी केली आहे. त्यामुळे हे प्रकऱण फाईल बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.   

एक मुलगी गेली, मात्र मला ५ मुली आहेत, आम्हाला जगू द्या, आम्ही यातून आता सावरलो आहोत. मला कोणाबद्दलही तक्रार द्यायची नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणात पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी माघार घेतल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणातील विलास चव्हाण हा एक महत्त्वाचा घटक  आहे. विलासला ताब्यात घेतल्यास या प्रकऱणातील अनेक पदर उलगडण्याची शक्यता आहे. पण विलास गायब झाला आहे. परंतु तो समोर आल्यानंतरच या प्रकऱणाचे गूढ उकलणार आहे.