कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षांत प्रभागातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण केली. मागील तीस वर्षापासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न माने कॉलनीतील पाण्याच्या टाकीमुळे कायमस्वरूपी निकालात निघणार असून, सम्राटनगर प्रभागाबरोबरच आजूबाजूच्या प्रभागातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव यांनी केले. सम्राटनगर,  माने कॉलनी येथे केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीच्या पायाभरणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आ. चंद्रकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाधव म्हणाल्या की,  पाच वर्षांत विकासकामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यातून प्रभागात पाच कोटीच्या विकासनिधीचा डोंगर उभारला. मागील तीस वर्षांपासून सम्राटनगर प्रभागाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. माने कॉलनीतील पाण्याच्या टाकीमुळे हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे.

पाण्याच्या टाकीच्या पायाभरणीची पूजा भागातील ज्येष्ठ नागरिक जयलक्ष्मी जैन व हंसराज जैन यांच्या हस्ते करण्यात आली. प्रदीप जाधव, डॉ. विजय सावंत, अनिकेत सावंत, कपिल मोहिते, शेखर घोटणे, सर्जेराव साळोखे, राजू नागावकर, सुरेश कोंडुसकर, सर्जेराव पायमल, सुनिता पाटील, स्वरूपा खुरंदरे, प्रीती पवार आदी उपस्थित होते.