नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील नागरिकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ची भावना दृढ करण्याची गरज आहे. त्यासाठी भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या होण्यासाठी उद्योगपतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केले. वर्षाच्या अखेरच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला.

मोदी पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकांनी नव्या वर्षानिमित्त एक संकल्प आवश्यक करावा. आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा.

मला अनेक नागरिकांनी पाठवलेल्या पत्रात देशाचे सामर्थ्य, देशाच्या एकजुटीचे कौतूक केले आहे. जनता कर्फ्यूसारखा अभिनव प्रयोग पूर्ण जगाला प्रेरणा देणारा ठरला. टाळ्या आणि थाळ्या वाजवून देशाने कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. एकजुट दाखवली. देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितला आहे. असंख्य आव्हाने होती, संकटं पण आले. कोरोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या. पण भारताने प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या, असे मोदी म्हणाले. दरम्यान, यावेळी मोदी यांनी जनता कर्फ्यू, कोरोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.