राशिवडे (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राधानगरी तालुका काँग्रेस आणि मित्रपक्षातर्फे भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय तालुक्यातील नेत्यांनी आज (सोमवार) पत्रकार बैठकीत जाहीर केला.

जिल्हा बँकेच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू होताच राधानगरीत विद्यमान संचालक आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांना शह देण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. आज कोल्हापूरात गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, दुधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, भोगावतीचे माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वनाथ पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणूकीत काँग्रेस व मित्रपक्षांतर्फ विश्वनाथ पाटील यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची घोषणा आज संध्याकाळी भोगावती येथे झालेल्या पत्रकार बैठकीत करण्यात आली.

यावेळी पी.डी.धुंदरे आणि हिंदुराव चौगले यांनी, गेल्या पंचवीस वर्षात जिल्हा बँकेच्या सत्तेअभावी काँग्रेस पक्षाची अपरिमित हानी झाली आहे. विद्यमान संचालकांनी मदत करणाऱ्यांना कधीही विश्वासात घेतले नसल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विश्वनाथ पाटील यांनी, गेल्यावेळी मी ए.वाय.पाटील यांच्यासाठी माघार घेतली होती. त्यामुळे पाटील यांनी आता माघार घेऊन काँग्रेसला संधी द्यावी अशी मागणी केली. तर आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अन्य गटांतूनही उमेदवारी मागणार असल्याचे हिंदुराव चौगले आणि संजयसिंह पाटील यांनी सांगितले.

या बैठकीला ए. डी. चौगले, धिरज डोंगळे, बी. आर. पाटील, जयवंतराव कांबळे, रविंद्र पाटील, सिरसेचे सरपंच सुभाष पाटील आदी उपस्थित होते.