नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला आज (गुरूवार) हिंसक वळण लागले. हरियाणाच्या सीमेवर पोलिसांनी रोखल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स फेकून देऊन पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले.    

दिल्लीमध्ये आंदोलक घसू नये, यासाठी आज सकाळी अंबाला-पटियाला सीमेवर पोलीस, आरएएफच्या तुकड्यांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यामुळे येथे आंदोलकांना रोखताच मोठा गदारोळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स फेकून दिले. तसेच आंदोलकांच्या गाड्या रोखण्यासाठी पोलिसांनी अंबाला-पटियाला सीमेवर लावलेल्या ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. येथे पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी धुमश्चक्री झाली असून अधिक पोलिसांची कुमक बोलावली आहे.