कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत मागील ४० वर्षांपासून संगीतकार, गायक, उत्कृष्ट तबलावादक आणि अभिनय क्षेत्रात ठसा उमटवलेले चंद्रकांत कागले (वय ५६, रा. कोल्हापूर) यांचे आज (शनिवार) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

चंद्रकांत कागले यांनी संगीतकार म्हणून त्यांनी प्रसन्न कुलकर्णीचे ‘अजा ग अजा’ हे पहिले नाटक संगीतबध्द केले होते. यानंतर विजय पाठक यांच्याबरोबर त्यांची जोडी जमली. सिनेसृष्टीमधे ‘चंद्र-विजय’ या नावाखाली त्यांनी वसंत पेंटर यांचा सड़ा हळदी कुंकवाचा, बाळूमामाच्या नावानं चांगभलं’साठी काम केले. या दोघांनीही ‘ फर्माइश -ए गझल’ या कार्यक्रमाचे सुमारे पाच हजार कार्यक्रम भारतभर तसेच परदेशात सादर केलेले आहेत. सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ति, साधना सरगम, स्वप्निल बांदोडकर, शंकर महादेवन अशा नामांकित गायकांनी या संगीतकार जोड़ीच्या दिग्दर्शनाखाली गायन केले आहे. त्यांनी अनेक नामवंत गायकांना साथ संगत केली त्यामध्ये अनुप जलोटा, अरुण दाते, अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ आदींचा समावेश आहे. तसेच, त्यांनी काही चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले होते. जितेंद्र देशपांडे दिग्दर्शित सप्त पुत्तुलिका या नाटकासाठी देखील त्यांनी संगीत दिले होते.

चंद्रकांत कागले, विजय पाठक, उदय सुतार, श्रीकांत साळोखे यांनी मिळून ‘सुरभि ऑर्केस्ट्रा’ची निर्मिती केली होती. ‘चंदू’ नावाने ते चित्रसृष्टीत ओळखले जात. अलिकडेच त्यांनी विविध वाहिनीच्या मराठी मालिकांमधे विविध भूमिका केल्या होत्या.