कोल्हापूर  (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याचे चेअरमन आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी दि. २४ रोजी ऐतिहासिक दसरा चौकात उपोषणाला बसणार आहेत. याला कोल्हापूरातील वीज बिल भरणार नाही कृती समिती आणि कॉमन मॅन संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र आज (शनिवार) समरजितसिंह घाटगे यांना देण्यात आले.

पत्रात म्हटले आहे की, समरजितसिंह घाटगे हे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, सरकारला जाग आणण्यासाठी हे उपोषण करीत आहेत. आमचीही भूमिका तीच आहे. त्यामुळे आमचा याला पाठिंबा आहे. लॉकडाऊन काळात वाढून आलेली घरगुती वीज बिल माफ करावे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान द्यावे. दोन लाखांचे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई मिळावी. या विषयांवर सरकार गेले वर्षभर केवळ घोषणा करीत आहे. याबाबत समरजितसिंह घाटगे यांनी आवाज उठविला आहे. उपोषणा दिवशी सर्वसामान्य जनतेसह आम्ही यामध्ये सहभागी होणार असल्याचे पाठिंबा पत्रात नमूद केले आहे.

या पत्रावर निवास साळोखे, बाबा पार्टे, अॅड. बाबा इंदुलकर, कोल्हापूर जिल्हा लोरी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, जयकुमार शिंदे यांच्या सह्या आहेत.