इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरामध्ये काही वर्षांपासून रस्त्याच्या बाजूस बेवारस वाहने, हातगाडी फलक व जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे आज (शनिवार) शहर वाहतूक नियंत्रण शाखा व नगरपालिकेने संयुक्त मोहीम राबवत ७ बेवारस वाहने,  ५ हातगाड्या, ५५ बोर्ड जप्त केले.   

इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्याने येथे परराज्यातून, व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहने येत असतात. शहराच्या काही भागातील रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. त्यातच रस्त्याच्या कडेला अनेक वर्षांपासून बेवारस वाहने, हातगाड्या, जाहिरात फलक लावून ठेवण्यात आले आहेत. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे आज शहर वाहतूक नियंत्रण शाखा व नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त मोहीम राबविण्याचे ठरवले. त्यानुसार पो. अ. को. अ. पो. गडहिंग्लज विभाग व इचलकरंजी उ. पो. अ., इ. न. पा. अतिक्रमण विभागप्रमुख सुभाष आवळे, नगरपालिका कर्मचारी व शहर वाहतूक नियंत्रण शाखा सपोनि. नंदकुमार मोरे व कर्मचाऱ्यांनी आज ७ बेवारस वाहने, ५ हातगाड्या, ५५ जाहिरात फलक जप्त केले. यामुळे वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होण्याची शक्यता आहे.