पुणे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे सीईओ जोपर्यंत रिटायर होत नाहीत, तोपर्यंत खुर्चीवर बसतात, शिवाय त्यांचे प्रमोशन होत जाते. पण तसे आमचे नसते, जनता सांगेल तोपर्यंत आम्ही खुर्चीवर बसतो. जनता म्हणाली घरी बसा की, आम्ही चाललो, असे सांगून राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय, अडकलोय. कुठे जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला. 

पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अजित पवारांनी आपल्या शैलीत टोलेबाजी करत विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना सल्ला दिला.

पवार म्हणाले की, कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने नवीन माध्यम स्वीकारले पाहिजे. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. माझा उच्चार व्यवस्थित व्हावा, यासाठी मी मास्क काढला. नाहीतर तुम्हीच म्हणाल, या बाबानेच मास्क घातला नाही आणि आम्हाला सांगतोय. या त्यांच्या विधानावर एकच हशा पिकला.