करवीर (प्रतिनिधी) : अज्ञात भरधाव वाहनाने ॲक्टिवा दुचाकीला ठोकर दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. हा अपघात पुणे-बेंगलोर महामार्गावर उचगाव हद्दीतील शिवनेरी हॉटेलनजीक गुरुवारी रात्री उशिरा झाला. उषा विवेक राणे (वय ३३, रा ब्लॉक नंबर ३२ म्हाडा कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नांव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा राणे गुरूवारी रात्री तावडे हॉटेलकडून ॲक्टिवाने (एमएच 09- इएच 5417) उचगावकडे जात होत्या. शिवनेरी हॉटेल नजीक महामार्गावर त्या आल्या असता भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या ॲक्टिवाला जोराची ठोकर दिली. त्यामुळे त्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच त्या ठार झाल्या. मृत महिलेचा कणेरीवाडी येथे वडापावचा स्टॉल आहे. त्यांची मुले लहान असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याबाबतची फिर्याद भारत मारुती बागडे (रा.उचगाव) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. याबाबत गुन्हा नोंद झाला असून पोलीस हवालदार विजय मुंदाळे तपास करत आहेत.