मुंबई (प्रतिनिधी) : चीनसमोर पळ काढे, असे निलाजरं विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत, अशी बोचरी टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत उत्तर देताना शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला होता. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे, असे विधान केले होते. यावर विरोधी पक्ष भाजपने टीका केली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांनी जवानांचा अपमान केला आहे, असा आरोप भाजपने केला आहे. भातखळकर यांनी या मुद्द्यावरून ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करून जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच, असेही अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.