मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत. काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. याबद्दल संताप व्यक्त करून केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. तसेच महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात गडकरी यांनी म्हटले आहे की, राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना शिवसैनिकांकडून नाहक त्रास दिला जात आहे. अडथळे आणले जात आहे. यामुळे महामार्गाची काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली आहे. ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे.

अर्धवट रस्त्यांची कामे ही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल अशी भिती व्यक्त करून कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली, तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल, असा गंभीर इशारा या पत्रात गडकरी यांनी दिला आहे.