मुंबई (प्रतिनिधी) : ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?’ असा हल्लाबोल भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला आहे. ‘ठाकरे सरकारची साधूसंतांना न्याय देण्याची इच्छा नाही आहे,’ असेही नारायण राणे म्हणाले. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. परंतु यात्रा सुरु होण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतले. त्यांची सुटका घेतल्यानंतर भाजपचे नेते नारायण राणे यांनी राम कदम यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

‘राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. हे तिन्ही पक्ष हिंदूविरोधी आहेत असे म्हणणार नाही. पण शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नाही. शिवसेनेला मी हिंदुत्ववादी म्हणणार नाही. हे तर तडजोडवादी आहेत. गद्दारी करुन शिवसेना सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विचारसरणीचे नाहीत. पदासाठी हवे ते करणारे उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना म्हणजे हिंदुत्व विचार आणि समीकरण नाही, असा घणाघातही नारायण राणे यांनी केला आहे.