गारगोटी (प्रतिनिधी) : बार सुरू पण मंदिरे कधी सुरु ? असा सवाल करीत महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यासाठी भुदरगड भाजपातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. महाराष्ट्रातील देवालये आज ही बंद आहेत. मंदिराशी संलग्न असणाऱ्या रोजगाराचा सुद्धा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे मंदिरे कधी सुरु होणार यासाठी हे उपोषण करण्यात आले. यावेळी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे गात वारकरी मंडळींनी राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.

भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. विनायक परुळेकर म्हणाले की, आदमापूर येथील बाळूमामा, कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल, दत्त मंदिर, नृसिंहवाडी यासारखी तिर्थक्षेत्रे आज ही बंद आहेत. सरकारने राज्यातील बार सुरू केले, पण मंदिर सुरू करायला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. तरी याबाबतची दखल राज्य सरकारने घेऊन मंदिरे सुरू करावीत. अन्यथा कायदा हाती घ्यावा लागेल, असे प्रतिपादन भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. विनायक परुळेकर यांनी केले.

यावेळी ग्रा. प. सदस्य प्रकाश वास्कर, पार्थ सावंत, सुशांत मगदूम,दिगंबर देसाई, युवराज पाटील, अमोल पाटील, अनंत डोंगरकर, सचिन हाळवणकर, दिलीप कदम, अमर पाटील, शिवाजी देसाई, युवराज कांबळे,  आदर्श पाटील, अमोल चव्हाण, सचिन चव्हाण, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.