नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाज अवनी लेखरा हिने  एकाच स्पर्धेत दोन पदकं जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.  ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच १ स्पर्धेत तिने कांस्य पदक पटकावले. अंतिम फेरीत ४४५.९ गुणांसह ती तिसऱ्या स्थानावर होती. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत अवनी लेखरा ११७६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात १२ वे पदक आले आहे. भारताने या स्पर्धेत २ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदक पटकावली  आहेत. 

दरम्यान, अवनी लेखराने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिक गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले होते. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.