करवीर (प्रतिनिधी) : गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील दोन बंद घरे फोडून सुमारे एकसष्ट हजारांचा मुद्देमाल लंपास केला. उचगांव बाबानगर परिसरातली चार घरेही चोरट्यांनी फोडली, मात्र तेथे काही मुद्देमाल मिळाला नाही. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील उदय कंच्चाप्पा पुंजी (वय २४ रा. माळी कॉलनी) यांचे घरी तसेच त्यांचे शेजारी जयदीप शिवाजीराव वर्धन यांचे घरी दोन घरफोड्या गुरुवारी पहाटे झाल्या. उद्य पुंजी व शेजारी वर्धन यांचे बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असा ६१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास हे.कॉ. बजरंग हेब्बाळकर करीत आहेत.