सांगली (प्रतिनिधी) : पगारवाढ व सातवा वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातले साखर कामगार ३० नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. दीड लाख साखर कामगार या आंदोलनात उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला. आज (शनिवार) सांगलीमध्ये झालेल्या राज्याच्या कामगार युनियनच्या कार्यकारिणीच्या बैठकीस हा निर्णय घेण्यात आला.  

चौदा महिन्यांपासून राज्यातल्या साखर कामगारांचे करार प्रलंबित आहेत. राज्य सरकार आणि साखर संघाकडे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. राज्यात साखर कारखानदारांची सत्ता आल्यावर किमान कामगारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या त्याबाबतीत दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आता कामगारांसमोर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याने ३० नोव्हेंबर रोजी पहाटे चारपासून राज्यातल्या सर्व साखर कारखान्याचे कामगार बेमुदत संपावर जातील आणि कारखाने बंद पडतील, सरकारने कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर बेमुदत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा साखर कामगार युनियनचे सचिव प्रदीप शिंदे यांनी दिला आहे.