कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कुंभी सहकारी साखर कारखान्यातून ऊस उतरवून ट्रॅक्टर कोगे मार्गे पाडळी येथे जात असताना कोगे धरणाच्या पुढे पाच अज्ञातांनी दमदाटी करून खाली उतरवून ट्रॅक्टर पळविल्याचा प्रकार सोमवारी घडला. याबाबत मेघराज लक्ष्मण चौंरे (वय ३०, रा. मूळ गाव जिवाचीवाडी, ता. केज, जि. बीड, सध्या रा. पाडळी) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

चौरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ८ मार्च रोजी कुंभी सहकारी साखर कारखान्यातून ऊस उतरवून कोगे मार्गे पाडळीला ट्रॅक्टर (नं. एम एच २३ एएस ३२५९) घेऊन चाललो होतो. कोगे धरणाच्या पुढे अज्ञात पाच जणांनी स्कॉर्पिओ (नं. एम एच ४४ जी ४४५१) ट्रॅक्टरच्या आडवी लावून मला दमदाटी करून जबरदस्तीने खाली ओढले. स्कॉर्पिओमध्ये बसवून एक ते दोन किलोमीटर अंतरावर नेऊन सोडले आणि हा ७ लाखांचा ट्रॅक्टर घेऊन पलायन केले.

मेघराज चौंरे यांच्या फिर्यादीनुसार करवीर पोलीस ठाण्यात पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.