मुंबई (प्रतिनिधी) : वाहनांच्या रांगेत ताटकळत राहून टोलनाक्यावर टोल भरण्याच्या कटकटीतून वाहन धारकांची सुटका होणार आहे. कारण जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने टोल वसूल करण्याच्या प्रस्तावावर काम सुरू आहे. त्यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नसेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते  अ‍ॅसोचॅम कॉन्फरन्समध्ये बोलत होते.  

नितीन गडकरी  म्हणाले की, पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता होईल. महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल. मंत्रालय सध्या जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने टोल वसूल करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. सर्व नवी वाहने जीपीएस सिस्टमशी जोडले जातील.  या सहाय्याने बस,  ट्रक चालकांकडून टोल वसूल केला जाणार आहे. जीपीएस यंत्रणा या वाहनांनी किती अंतर पार केले आहे याचे मोजमाप करन आपोआप टोलची रक्कम वसूल करेल. सध्या फास्टटॅग या नव्या प्रणालीमुळे टोलनाक्यांवरील वाहनांचा वेग कमी होण्याचे किंवा थांबवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे.