कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने 1800 233 1913 हा टोल  फ्री क्रमांकाची सुविधा सुरु केली आहे. ही सुविधा महनगरपालिकेच्या कार्यालयीन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहील, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.

त्या म्हणाल्या, महापालिकेसंबंधीच्या तक्रारीसाठी नागरीकांनी आता घर बसल्याच तक्रार करता येणार आहे. कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत आपल्या दैंनदिन किरकोळ तक्रारी जशा गटर साफ करणे, औषध फवारणी, तनकट काढणे, कचरा उठाव, किरकोळ स्वरुपाचे अतिक्रमण, पाणी पुरवठा संदर्भातील तक्रारी, डांबावरील बल्ब बसविणे त्याचप्रमाणे स्वच्छता व आरोग्य संदर्भातील तक्रारी दाखल कराव्यात. यावरील तक्रारींची तात्काळ दखल घेऊन त्याचे निराकरण केले जाईल.