मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात महिनाभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. सरकारकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. तर आज (बुधवार) राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक ट्विट करून आंदोलनावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो, असे ट्विट  शरद पवार यांनी केले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन केंद्रातील भाजप सरकारने गांभीर्याने घ्यावे. अन्यथा ते दिल्लीपुरते सीमित न राहता त्याची व्याप्ती देशभर पसरेल. देशातील जनतेच्या पोटाची भूक भागविणारा शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. हे आंदोलन गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असा सल्ला शरद पवार यांनी सरकारला दिला होता.