जमीन विक्रीस इच्छुकांनी संपर्क साधावा : बाळासाहेब कामत

0
109
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. ज्या जमिन मालकास शासनाने निश्चित केलेल्या जमिनीच्या दरानुसार किंवा जिरायत जमिन कमान ५ लाख प्रति एकर व बागायत जमीन कमाल ८ लाख रूपये प्रति एकर प्रमाणे विक्री करावयाची आहे, अशांनी जमिनीच्या सात बारा आणि आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द भूमीहिन शेतमजूर कुटूंबांना कसण्याकरिता २ एकर बागायती किंवा ४ एकर जिराईत जमीन शंभर टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येते. जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त आणि क्षारपड जमीन असू नये. जमीन सलग असावी. या योजनेंतर्गत ज्या गावात जमीन उपलब्ध होईल त्याच गावातील अनुसूचित जातीचे, दारिद्रय रेषेखालील, भूमीहिन, त्याच गावचा रहिवाशी असलेले व १८ ते ६० वयातील त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. त्या गावात लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.
लगतच्या गावातही लाभार्थी उपलब्ध न झाल्यास तालुकास्तरावरील पात्र लाभार्थ्यांचा विचार करण्यात येईल. यामध्ये अंतिमत: परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल, असेही कामत यांनी सांगितले.