मुंबई  (प्रतिनिधी) :  राज्यात लॉकडाऊन सदृश कठोर निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ यावर्षीही  अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने दिल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या सुरक्षित वावर व इतर सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. सर्वांसाठी मास्क बंधनकारक राहील, याची दक्षता घेण्यात यावी,  अशा सूचनाही दिल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने ब्रेक द चेन अंतर्गत आदेश जारी केले आहेत. १ मेरोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच यंदाही साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध सूचना देण्यात आल्या आहेत.