मुंबई (प्रतिनिधी) : वादग्रस्त विधान करणाऱ्या शरजील उस्मानी याला अटक केले जात नाही, पण त्याला अटक का केले नाही म्हणून भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीने आंदोलन केले. त्या पदाधिकाऱ्यांना घरात जाऊन ताब्यात घेतले गेले. हेच मोठं आश्चर्य असून हे शरजीलचे सरकार आहे. त्याला संरक्षण देणारे सरकार आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आज (बुधवार) हल्लाबोल केला. भाजपच्या प्रदेश मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, सेलिब्रिटींचा प्रश्न आहे, तर ज्यांनी चौकशीची मागणी केली आणि ज्यांनी मागणी मंजूर केली. त्या दोघांचंही मानसिक संतुलन बरोबर नाही. त्याची तपासणी झाली पाहिजे. चौकशी तर त्यांच्या मानसिक संतुलनाची व्हायला हवी. कारण भारताच्या सार्वभौमत्वाशी छेडछेड सहन केली जाणार नाही, असे ट्विट आहे. भारताच्या अखंडतेवर हल्ला होऊ देणार नाही, असं म्हणणं चुकीचं असेल, तर आपल्या सगळ्यांना सरकारने अटक करावी, अशी खोचक मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.