मुंबई (प्रतिनिधी) सोळा आमदार निलंबन प्रकरणी दोन दिवस कमी मुदत दिली म्हणून कोर्ट आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदत देते आणि राज्याच्या विधानसभेचे अधिवेशन एक दिवसात बोलावतात, हा फक्त अन्यायच नाही तर भारतीय घटनेची पायमल्ली आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी ट्विट करत टीका केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अभिषेक मनू सिंघवी शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.

शिवसेनेत बंडखोरी उफाळून आल्यानंतर भाजपने त्यांच्या आमदारांना राज्यातच थांबण्याचे आदेश दिले होते. आता बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमदारांना ताज हॉटेलमध्ये जमण्यास सांगण्यात आले आहे.