मुंबई (प्रतिनिधी) : केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज (गुरूवार) होत आहे. या बैठकीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान केले आहे. एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाही, ही माझी वैयक्तिक भूमिका आहे, महाविकास आघाडीची नाही, असे पवार यांनी म्हटले आहे. ते  बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले आहे. आमची भूमिका मान्य करा, अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे, दिल्लीत हे आंदोलन चिघळले आहे, त्यामुळे कृषी विधेयकाबाबत काही प्रमाणात बदल करण्याचे निर्णय घेतले जातील, पण बिल संपूर्ण रद्द करावे ही शेतकऱ्यांची भूमिका आहे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे, आज त्याचबाबत महत्त्वाची बैठक होत आहे, असे पवार यांनी सांगितले.