मुंबई (प्रतिनिधी) : सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून, विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते. गद्दारी करुन राज्यात सरकार आल्याचे पोस्टर झळकावण्यात आले. आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचे म्हटले आहे. ज्यांनी लोकशाहीचा खून केला, त्यांच्या विरोधात आम्ही उभे आहोत. हे गद्दार सरकार असून कोसळणारच, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचे सरकार आहे, असे ते म्हणाले.