गुवाहाटी (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सोडले असले तरी ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत, असे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदार हे गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये मुक्कामास आहेत. त्या ठिकाणी आमदार हे संवाद साधत आहे. बुधवारी झालेल्या एका संवादात आमदार गुलाबराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे. पाटील म्हणाले, त्यांनी वर्षा सोडले, त्यांनी सर्वांना सोडले. आमच्या सारख्या ५२ आमदारांना सोडले आहे; पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. आम्ही पक्षासाठी भरपूर केलेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आमची परिस्थिती ज्यावेळेस काही नव्हती. काय काय केले ते आम्हाला माहीत आहे. आमचाही त्याग आहे. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाही. आम्हाला पुन्हा टपरीवर पाठवविण्याची भाषा करता; पण चुना कसा लावतात हे संजय राऊतांना माहीत नाही. आपण सगळेजण एकत्रित लढाई लढू, असे गुलाबराव पाटील म्हणाले.