मुंबई (प्रतिनिधी) : कोकणात गणपती उत्सवाला  जाणाऱ्यांसाठी खास काळजी घ्यावी लागणार आहे. त्याबाबत एसटी महामंडळाने तयारी केली आहे. कोकणात प्रवास करताना प्रवाशांना मास्क बंधनकारक असणार आहे. तसेच प्रवासापूर्वी सर्व बसेसचे निर्जंतूकीकरण केले जाणार आहे.

यंदा गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.  दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीच्या जादा गाड्या सोडण्यात येतात. चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. यासाठी उद्या (दि.१६) जुलैपासून याच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे.

तसेच गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकदेखील तैनात करण्यात येणार आहे.