नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या ओमीक्रॉन विषाणूमुळे साऱ्या जगात चिंतेचे वातावरण असताना भारत सरकारने याबाबत उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, देशात अद्याप तरी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसल्याची दिलासादायक माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज  (मंगळवार) राज्यसभेत दिली.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे.  राज्यसभेत बोलताना मनसुख मांडवीय यांनी  देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण अद्यापतरी आढळलेला नाही, असे सांगितले. आतापर्यंत १६ देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’  व्हेरियंटचा संसर्ग पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, ब्रिटन, नेदरलंड, जर्मनी, हाँगकाँग, इटली, बेलजियम, इस्रायल, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि स्पेन या देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले आहेत.  त्यामुळे या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच कडक तपासणी कऱण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे.