मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कदाचित घटनेचे गांभीर्य लक्षात आलेले नसावे. त्यांनी कदाचित पूजा चव्हाण प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप ऐकल्या नसाव्यात किंवा नीट माहिती घेतलेली नसावी. त्यांनी ऑडिओ क्लीप नीट ऐकल्या तर त्यांना कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते समजेल, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणीची सखोल चौकशी करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. परंतु या प्रकरणात पोलिसांकडून गांभीर्याने कारवाई होताना दिसत नाही, त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

फडणवीस यांनी म्हटले आहे की, पोलिसांकडे ऑडिओ क्लिप आहेत. त्यातला आवाज कोणाचा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र, पोलिसांनी तो आवाज कोणाचा आहे, ते सांगायला हवे. सत्य लोकांसमोर यायला हवं. पण पोलिसांवर दबाव असल्याने त्यांच्याकडून सत्य लपवले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असेल, तर तेही योग्य नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.