मुंबई (प्रतिनिधी) : लव्ह जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. त्यावरुन भाजपच्या काही नेत्यांकडून महाराष्ट्रात हा कायदा कधी आणणार, अशी विचारणा केली जात होती. त्यावेळी संजय राऊत यांनी भाष्य केले. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

ते म्हणाले, लव्ह जिहादबाबत माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये कायदा बनू दे. पण बिहारमध्ये जेव्हा नितीश कुमार कायदा बनवतील तेव्हा त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करू आणि त्यानंतर महाराष्ट्रात कायद्याबाबत विचार करु. बिहारमध्ये भाजपचीच सत्ता आहे. नितीश कुमारही त्यांचेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तिथे कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करू. लव्ह जिहादपेक्षा अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना पंतप्रधानांची सांगितलेलं समजत नसेल तर ती दुदैवी आहे. कोरोनाची महामारी ही दुसऱ्या महायुद्धापेक्षा भयंकर आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला धोका पोहोचतोय, बेरोजगारी वाढतेय. आपल्याला कोरोनाशी लढायचे० आहे, असे पंतप्रधान सांगतात. पण महाराष्ट्रातील नेते पंतप्रधानांचे ऐकत नाहीत. ज्याप्रकारे रस्त्यावर आंदोलन करत आहे. मंदिरे उघडण्यासाठी जमाव गोळा करुन आंदोलन करत आहेत, त्यामुळे कोरोना वाढतोय. ते कोरोनाचे बाप आहेत. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकार आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील. हा मुद्दा त्यांच्या विचाराधीन असू शकेल.