मुंबई (प्रतिनिधी) : मी माझ्या राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवले आहे. बंडखोर आमदारांनी समोरासमोर येऊन सांगितल्यावर मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवरून जनतेशी संवाद साधताना घातली.

मी मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याचे समोर येऊन सांगावे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना हिंदुत्वापासून आणि हिंदुंत्व शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. विधान भवनात हिंदुत्वाबाबत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची नाही असे भासवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेंनी तुम्हाला खूप काही गेले हे लक्षात ठेवले पाहिजे. शस्त्रक्रियेमुळे भेटू शकत नव्हतो. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडलेले शब्द. हो दोन्ही शब्द कदापिही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत.

हिंदुत्वावार बोलण्याची ही वेळ नाही. मग नेमके झाले काय, ही शिवसेना कोणाची. काही जण ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही म्हणतात. ठीक आहे. असे मी काय केले. त्यावेळेला जे विचार होते, तेच मी पुढे नेतोय. २०१४ साली प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आणले. पहिल्या प्रथम शिवसेना कोणाची, हिंदुत्व सोडले का, मधल्या काळात जे काही दिले, ते बाळासाहेबानंतर शिवसेनेने दिले आहे, असे ते म्हणाले.

सध्या राज्यात काय चाललंय. काही जण सूरतला गेले. त्यानंतर गुवाहटीला गेले. विधान परिषद निवडणुकीच्या अधल्या दिवशी सगळे आमदार हॉटेलमध्ये होते. मी तिकडे गेलो. ज्यांना आपले मानतो. आपली माणसे यांना एकत्र ठेवावे लागते.शंका ठीक आणि लघुशंकेला गेले तर शंका. ही कसली लोकशाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

साधा महापालिकेत उभा न राहिलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार हा प्रश्न मी पवारांना विचारला. पण त्यांनी आग्रह केला. राजकारण हे राजकारण असले पाहिजे. वळणदार राजकारण रडकुंडीच्या घाटासारखे असू नये. प्रशासनाने मला सांभाळून घेतले. मला धक्का कशाचा बसला आहे? तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने म्हटले की, आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नकोयत, तर एक वेळ ठीक आहे. आज कमलनाथ यांनी स्वत: फोन करून म्हटले की, उद्धव आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण माझ्याच लोकांना मी नको आहे, त्याला काय म्हणावं?

आजही या लोकांपैकी एकानेही सांगितले की, उद्धव आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात, तर मी आजच वर्षा सोडून मातोश्रीवर जायला तयार आहे. त्यांनी हे समोर येऊन बोलावे, उगाच शिवसेनेला आम्ही सोडणार नाही, हिंदुत्वाचा मुद्दा असे याच्या त्याच्या जवळ सांगू नये. मी सत्तेला चिकटून बसणारा माणूस नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. मला सत्तेचा मोह नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे, तशीच परिस्थिती आता आली आहे, असेही शेवटी ते म्हणाले.