कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागेपर्यंत नोकर भरती करू नये, या मागणीसाठी उद्या (सोमवारी) सकाळी ६ वाजता दसरा चौकातून मुंबईत धडक मारणार आहे. पोलिसांनी बळाचा वापर केला तरी गनिमी काव्याने मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार आहे. बळाचा वापर करून पोलिसांनी अडवणूक केल्यास प्रसंगी कोल्हापूर बंद करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी दिली.

ara

ते म्हणाले, न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी होत आहे. सुनावणी संपून अंतिम निकाल लागेपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची नोकर भरतीची प्रक्रिया राबवू नये. आता सुरू असलेल्या विविध विभागातील नोकर भरती थांबवावी, या मागणीसाठी मुंबईत सोमवारपासून आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सहभागी होऊ नये, यासाठी पोलीस बळाचा वापर करीत आहे. म्हणून सुमारे २०० कार्यकर्त्यांना मुंबईत आता पोहचवले आहे. आम्ही शंभर कार्यकर्ते सोमवारी सकाळी दसरा चौकातून मुंबईला जाणार आहे. त्यावेळी पोलिसांनी आम्हाला अडवून अटक केले तर त्याचे तीव्र पडसाद उमटतील. अटकेच्या निषेधार्थ प्रसंगी कोल्हापूरही बंद करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.