पंढरपूर (प्रतिनिधी) : संपूर्ण जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे सर्वच सार्वजनिक आणि धार्मिक सणांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यदांच्या वर्षातील सर्व धार्मिक सण, वारी रद्द करण्यात आले आहेत. त्याचमुळे कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास शासनाने मनाई केली आहे. वारकऱ्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री मात्र कार्तिकीची शासकीय महापूजा कसे करू शकतात? हा दुजाभाव शासनाने करू नये. वारकऱ्यांना वारी नाहीतर उपमुख्यमंत्र्यांनी ही वारी करू नये, असे आवाहन ह.भ.प. राणा महाराज वासकर यांनी केले आहे.

कार्तिकी वारी संदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राणा महाराज वासकर, भागवत महाराज चवरे, विष्णु महाराज कबीर, मनोहर महाराज बेलापुरकर, रंगनाथ महाराज राशनकर, जगन्नाथ महाराज देशमुख, देविदास महाराज ढवळीकर, एकनाथ महाराज हांडे, चैतन्य महाराज देहूकर, गणेश महाराज कराडकर, श्याम महाराज उखळीकर यांच्यासह अन्य महाराज उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने कार्तिकी यात्रेसाठी आषाढी वारी प्रमाणे कठोर निर्बंध लादले आहेत.

सरकारने वारकऱ्यांच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा समन्वय समितीने पुढे होणाऱ्या सर्व निवडणूक मतदान प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केले आहे. त्याची सुरुवात येत्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वारकरी संप्रदायाला एवढे निर्बंध असतील, कार्तिकी एकादशीची श्रीविठ्ठलाच्या महापुजेला बाहेरुन कोणीही न येता ही महापूजा प्रांताधिकारी यांच्या हस्ते करावी, असे मत महाराजांनी व्यक्त केले आहे. मतदान करु नये असा करणार प्रचारकार्तिकी वारीत पंढरपूर स्थित सर्व फडकरी महाराज मंडळींना भजन कीर्तनाचे नियम पार पाडावयाचे असल्याने ही कार्तिकी यात्रा झाल्याबरोबर ज्या पदवीधर मतदार संघात निवडणूक आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन  मतदान प्रक्रीयेवर वारकरी, व विठ्ठल भक्तांनी बहिष्कार टाकत मतदान करु नये असा प्रचार दौरा करण्याचे बैठकीत ठरवण्यात आले असल्याचे राणा महाराज वासकर यांनी सांगितले.”,