नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न दोन डिसेंबरपर्यंत न सोडवल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांची आज (शनिवार) नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारला दोन डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे काही महिन्यांपासून रखडलेली अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. परंतु, यामध्ये मराठा आरक्षणाशिवाय ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे.

त्यामुळेच राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचे प्रश्न २ डिसेंबरपर्यंत सोडवावेत, अन्यथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येईल, अशा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.