कागल (प्रतिनिधी) : गेली अडीच महिने एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यासह जनतेचीही कुचंबणा होत आहे. कांही कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भितीने जीव गमावले आहेत. राज्य शासन आणखी किती कर्मचाऱ्यांच्या बळीची वाट पाहत आहेत ? असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केला. ते कागल येथे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना साखर वितरणावेळी बोलत होते.

समरजितसिंह घाटगे म्हणाले की, एसटीच्या सुरक्षित भवितव्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढावा. त्यांची व जनतेची होणारी कुचंबना दूर करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. राज्य शासनाने दोन वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना दिलेला कोणताही शब्द पाळला नाही. त्यामुळे विश्वासाहर्ता गमावलेल्या शासनावर एसटी कर्मचाऱ्यांचाही विश्वास राहिलेला नाही. या कर्मचाऱ्यांच्या सोबत आपण ठामपणे राहणार असून कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शाहूचे संचालक यशवंत माने, राजे बॅंकेचे संचालक राजेंद्र जाधव, अनिल शेटे, अनिता माळी, सुनिता जाधव, आशा गोंधळी, नसीमा हकीम यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.