मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या कोरोना संसर्गाचा कहर कमी झाला असला तरी, एक चिंताजनक माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी वर्तवली  आहे. त्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून  डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सगळ्या डॉक्टरांना, सरकारी रुग्णालयांना, जि्ल्हा रुग्णालयांना, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहा, असे या पत्रात त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत चाचण्या थांबवता येणार नाहीत. कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचनाही डॉ. अर्चना पाटील यांनी दिल्या आहेत.