दिंडनेली (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथील कु. सुशांत राजाराम पाटील (वय २१) या युवकाने आज (बुधवार) आपल्या राहत्या घरी सायंकळाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत हा कोल्हापूर-गारगोटी रोडवरील जैताऴ फाटा येथील महाविद्यालयामध्ये बीए भाग दोनमध्ये शिकत होता. त्याचा स्वभाव शांत आणि मनमिळावू होता. त्याचा मित्रपरिवार ही मोठा होता. त्यासोबत तो लष्कर आणि पोलीस भरतीसाठी जोरदार प्रयत्न करीत होता. तर आता सुरु असलेल्या अग्नीवीर भरतीसाठी त्याने जोरदार तयारी देखील केली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सायंकाळच्या सुमारास सुशांतला आईने चहा करुन दिला आणि ती शेताकडे गेली. यावेळी सुशांतने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने आई घरात आली असता तिने सुशांतची शोधाशोध केली मात्र, तो दिसून आला नाही. पुन्हा तिने घरातल्या माळ्यावर पाहिले असता सुशांतने गळफास घेतली असल्याचे दिसून आले. यावेळी त्याच्या आईने मोठ्याने आरडाओरडा केली.

यावेळी शेजाऱ्यांनी येऊन दोरी कापून पुढील उपचारासाठी कोल्हापूरात नेले असता डॉक्टरांनी मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला. यावेळी सीपीआर परिसरामध्ये नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. परंतु, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.