टोप (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे शुक्रवारी बंद झालेला पुणे-बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी ओसरत असली तरी पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद आहे.

शिरोली एमअआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधले मंगल कार्यालय, पुणे -बेंगलोर हायवेवर दुतर्फा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली होती. तावडे हॉटेल कडून ब्रिज वरून बरेचसे नागरिक पायी चालत, तसेच मोटरसायकल, चारचाकीने विरुद्ध दिशेने येण्याचा प्रयत्न करत होते. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र केरबा चौगुले हे कारमधून हायवे पार करत होते. पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांची गाडी काही अंतरावर वाहत गेली. गाडीचा दरवाजा उघडून गाडीवर उभारले. ते एका झाडाला धरून थांबले. बोट लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकली नसल्याने स्थानिक सामाजिक तरूण कार्यकर्ते, यांच्यासह मच्छिमार समीर सनदे याच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर तीन तासांनी त्यांना वाचवण्यात यश आले.

रस्ता बंद त्यामुळे हजारो वाहने मार्गावर काल सायंकाळपासून अडकून आहेत. याशिवाय कार, टेम्पो लांब पल्ल्याच्या बसेस निमआराम बसेस जागेवर थांबून आहेत. महापुरामुळे रस्त्यावर अडकून पडलेल्या साडेचारशे वर वाहनधारक कामगार प्रवाशांची शिरोली एमआयडीसीमधील मदरसामध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि त्यांचा संपूर्ण फौजफाटा तैनात होता.